
वरील छायाचित्रामध्ये मध्यभागी कै. अनंत भालेराव यांच्या समग्र लेखनावर झालेले संशोधन – संशोधक – प्रा. वृंदा देशपांडे – जोशी, मार्गदर्शक – प्रा. डॉ, लता मोहरीर
बाजूच्या चार छायाचित्रांमध्ये कै.अनंत भालेराव यांच्यावर प्रकाशित झालेली इतर पुस्तके.
आठवणी अनंतरावांच्या – डॉ. लता मोहरीर
आज सकाळी अनंत भालेरावांचा फोटो पाहिला व त्यांच्या आठवणी मनात गर्दी करू लागल्या –
महाविद्यालयातील भगवंतराव देशमुख , रसाळ , पठाण , वा. ल . कुळकर्णी यांच्याप्रमाणे अनंतराव आमच्या पिढीचे प्रत्यक्ष शिक्षक जरी नव्हते तरी गुरूकुलातील दीपस्तंभाचे स्थान मात्र त्यांना निश्चितच लाभलेले होते. आमच्या जडणघडणीच्या काळात वाचनाची आवड व अभिरुची जोपासण्याचे कार्य त्यांनी व मराठवाडा दैनिकाने अर्धशतकभर निश्चितच केले. सुरुवातीच्या काळात अरुण-सविताचे वडील म्हणून, नंतर मराठवाडा दैनिकाचे संपादक म्हणून, मराठवाडा साहित्य परिषदेचे एक आधारस्तंभ म्हणून, सन्मित्र कॅालनीतील रहिवासी म्हणून, एक निर्भीड धडाडीचे पत्रकार म्हणून, ज्येष्ठ विचारवंत म्हणून आणि पितृवत् लोभ करणारे कौटुंबिक आस्थेतून ते अधिकाधिक परिचित होत गेले.
१९५५-५६ चा काळ. आम्ही जाधवमंडीत भावठाणकरांच्या वाड्यात राहात होतो. मी शारदा मंदिरमध्ये शिकत होते. माझ्या वडिलांचा वकीलीत जम बसत होता. आमच्या घराच्या कोप-यावर चंद्रगुप्त चौधरींच्या घराजवळ एका वाड्यात अनंतराव, मेढेकर सर ही मंडळी राहायची, तर मागच्या गल्लीत गुजराती हायस्कूलसमोर भगवंतराव देशमुख राहात होते. औरंगाबाद तेव्हा गल्ल्यांचेच गाव होते. त्यामुळे सगळेजण एकमेकांना नावाने ओळखत असायचे, रस्त्यात भेटीगाठी झाल्या तर नमस्कार करून औपचारिक बोलणी व्हायची. तो काळ आम्हा मराठवाड्यातील मुलींच्या दृष्टीने वडीलधा-या मंडळींबद्दलचा आदरयुक्त धाक बाळगण्याचा होता. शिवाय शाळा , मैत्रिणी व कुटुंब यापलीकडचे जग माहीतच नसायचे.
अरूण-सविताचे वडील मराठवाडा वृत्तपत्राचे काम पाहतात एव्हढेच कळत होते. शिवाय माझे वडील( ॲड. किसनराव वासडीकर) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून काम करू लागले होते. आमच्याकडे तेव्हा तरुण भारत हे वृत्तपत्र येत असे. अनंतराव व आमचे काका , दोघेही भिन्न विचारसरणीचे. तेव्हा दोघांचे परस्परांशी बोलणे,वागणे तसे दूरत्वाचे औपचारिकच असणार. हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या काळात रझाकाराची जुलमी राजवट आमच्याही कुटुंबाने अनुभवली होती. प्रत्यक्ष लढ्यात सहभाग नसला तरी कुटुंबातील माणसे ठिकठिकाणी विखरून राहिली होती.
एकाच बाबतीत अनंतराव व काका समानधर्मी होते. दोघांच्याही कुटुंबाच्या व्याख्या ऐसपैस होत्या. आम्ही सख्खी भावंडे, पुतणे-भाचे, शिकायला आलेले विद्यार्थी, पाहुण्यांचा सततचा राबता, येणारे – जाणारे, संघप्रचारक, असे ‘खटल्याचे घर’ आमचेही होते. आम्ही मुले कोणत्या वर्गात काय शिकतोय इकडे लक्ष द्यायला काकांना फुरसतही नसायची. त्यांच्या एकट्याच्या मिळकतीला अशा अनेक वाटा फुटलेल्या असत. आई सगळे निभावून न्यायची. अशा परिस्थितीत आम्ही जुन्या औरंगाबादेतून नव्या औरंगाबादेतील नव्या घरात अजबनगरात राहायला आलो. १९६०-६१ ला सन्मित्र कॅालनीतही भालेराव मंडळी , भगवंतराव देशमुख , मेढेकर, हेही राहायला आले. सगळ्यांचीच आर्थिक ओढाताण चालू असायची.
१९७५ ची ही आठवण आहे. इंदिरा गांधींनी २६ जूनला देशभर आणीबाणी जाहीर केली. सर्व विरोधकांची, विशेषत: रा.स्व.संघवाल्यांची धरपकड सुरू केली. काका तेव्हा जिल्हासंघचालक होते. काहीही पूर्वकल्पना नसतांना त्यांना २६ जूनच्या संध्याकाळी कोर्टातून पकडून हलवले. कुठे नेले तेही कळेना. आम्ही कुटुंबीय काहीशा हादरलेल्या, भयावह अवस्थेत होतो. २७ तारखेच्या सकाळी ६ वाजता मराठवाडा कार्यालयातील माणूस, “मला, अनंतरावांनी ताबडतोब कार्यालयात भेटायला बोलावले आहे”, असा निरोप घेऊन आला. धास्तावलेल्या मन:स्थितीतच मी त्यांच्या घरी पोहोचले.तेव्हा त्यांनी सांगितले- रात्री टेलिप्रिंटरवर सगळ्या संघवाल्यांची बॅंकखाती गोठवावीत असा केंद्रसरकारचा आदेश असल्याची बातमी आली आहे. किसनरावांचे बॅंकखाते असेल तर ते लगेच दुस-यांच्या नावावर ट्रान्सफर करून घ्या. अत्यंत तत्परतेने व आस्थेने अनंतरावांनी दिलेल्या सूचनेने केवढा तरी फायदा झाला, तेव्हा काकांचे पाच हजार बॅंकेत होते व सुदैवाने एका चेकवर त्यांनी सही करून ठेवलेली होती. बॅंक उघडल्यावर मी लगेचच ते माझ्या नावावर जमा केले व दर महिन्याला आईला २५० रू घरखर्चासाठी काढून दिले. घरात अनंत अडचणी होत्याच , धाकट्या भावंडांची शिक्षणे अर्धवट झालेली , बहीण बाळंतपणाला आलेली इ. ते एकटेच मिळवते होते आणि सार्वजनिक जीवनात कृतिशील असणा-याजवळ किती शिल्लक असणार याची जाण अण्णांना होती. अशा प्रसंगी विरोधी विचारसरणीला महत्त्व देण्यापेक्षा माणूस म्हणून केलेला विचार त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. पुढे दोघांची नाशिकच्या तुरुंगात भेट झाली .
अण्णांचा हा पितृवत् लोभ पुढील काळात कायम राहिला. मला ते कायम ‘विदुषी’ म्हणायचे. मी व उषाताई हस्तक घरी गेलो की त्यांचा थट्टेखोर , मिश्किल स्वभाव प्रत्ययास यायचा. त्यांना हवे असलेले पुस्तक उषाताई विद्यापीठाच्या ग्रंथालयातून आणून द्यायच्या, त्यावर चर्चा व्हायची, सुशीलाबाईही बरोबरीने गप्पा मारायच्या. खूप छान दिवस होते ते. शेवटी शेवटी आम्ही भेटायला गेल्यावर म्हणायचे ‘बघा बरं, मी आता ग.दि माडगूळकर दिसतो की नाही‘. स्वतःवर विनोद करण्याचा दुर्मिळ गुण असा दिसायचा.
एक काळ असा होता की ‘मराठवाडा’ वाचल्याशिवाय घराबाहेर पडायचे नाही अशी सवय लागलेली होती. आणीबाणीने तर वृत्तपत्राशिवाय जगणे अवघड करून टाकले होते.अनंतरावांची पुस्तके जसजशी प्रकाशित होत गेली, तसतसे त्यांचे वाचन चालू असायचे. ‘मांदियाळी’ची तर कितीतरी पारायणे झाली. पण त्यांचे समग्र लेखन एका वेळी वाचता आले नाही याचे असमाधान कुठेतरी मनात होते. ती संधी जेव्हा माझ्या विद्यार्थिनीने पीएच् डी साठी त्यांच्या संपूर्ण लेखनाचा विश्लेषक अभ्यास करायचा ठरवला तेव्हा मिळाली. तिच्या निमित्ताने त्यांचे सर्व लेखन विनाव्यत्यय वाचता आले याचा आनंद झाला. जी मूल्यनिष्ठा त्यांनी आजन्म जोपासली ती समजून घेतांना त्यांच्या विषयीचा आदरभाव वृद्धिंगत होतं गेला. अशा वेळी ३५ वर्षांचा काळ ओलांडून त्यांचे आपल्या आयुष्यातील असणे किती समृद्ध करणारे होते हे लक्षात येते. त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन!
कै. अनंत भालेराव यांच्या स्मृतिदिनानिमित्त पस्तुरी तर्फे विनम्र अभिवादन!
आजच्या स्मृतिदिनानिमित्त पस्तुरी youtube चॅनलवर आयोजित विशेष चर्चेचा अवश्य लाभ घ्या.
चर्चा विषय – अभियांत्रिकी शाखेतील प्रवेशप्रक्रिया
सहभाग –
समुपदेशक – श्री सुनील लक्ष्मण जोशी
पालक – श्री आशय चंद्रकांत जोशी
विद्यार्थी – कुमारी श्रिया आशय जोशी
सूत्रसंचालन – वृंदा आशय
चित्रीकरण व संपादन – शर्विल आशय जोशी

‘बातमी’ / ‘बात’ ‘मी’ / बात ‘मी’
सकाळीच डॉ. सविताताई पानट निवर्तल्याची बातमी आली. मन कळवळलं. निसर्गनियम आहे, आला तो कधी ना कधी जाणारच. पण माझ्यासाठी अण्णांची (कै. अनंत भालेरावांची) लेक गेली. विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवीसाठी मी अनंत भालेरावांच्या समग्र साहित्याचा अभ्यास केला. त्या अभ्यासातून मला मराठवाडा प्रदेश उमगत आणि उलगडत गेला.
अण्णांचे मराठवाडा प्रदेशासाठीचे योगदान पाहिले असता लक्षात आले, त्यांचे कुटुंब घरादाराच्या भिंतींशी नाते सांगणारे, एका विशिष्ट चौकटीपुरते मर्यादित नव्हते. या घराच्या उंबरठ्याने कुटुंबजीवन आणि समाजजीवन यातलं अंतर मिटवले होते. अनेकानेक कुटुंबांना सामावून घेत, वारकरी निष्ठांशी तद्रूप होत मूल्यसंस्कारांची बीजं पेरली होती.
अण्णांच्या कारकीर्दीने हा वारसा केवळ माणसांनाच नव्हे तर पत्रकारितेच्या क्षेत्राला दिला होता. स्वातंत्र्यपूर्व काळातील पत्रकारितेची जी तेजस्वी परंपरा त्यांनी अनुभवली होती; तिच्याशी एकनिष्ठ राहात, स्वातंत्र्योत्तर काळात देखील मूल्यजोपासनेसाठी तुरुंगवास पत्करला होता. स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या, बोलणाऱ्या, लिहिणाऱ्या या माणसाने हाती अंगार धरला होता. दुर्दैवाने बदलत्या काळाबरोबर पत्रकारिता क्षेत्रात होत गेलेल्या मूल्यांच्या घसरणीविरुद्ध त्यांना लेखणी चालवावी लागली. ज्या जीवनमूल्यांच्या वैभावापुढे संपत्ती आणि भौतिक सुखसोयी कस्पटासमान मानणारी पीढी त्यांनी अनुभवली होती तीच जीवनमूल्ये रसातळाला घेऊन जाणारा समाज त्यांना पहावा लागला. त्यांच्या लेखनातून जागोजागी त्याविषयी व्यक्त होणारी खंत माझ्या मनात या दु:खाला धगधगत ठेवते.
सविताताईंच्या निधनाची बातमी आली आणि अण्णांच्या पत्रकारिता क्षेत्रातली ‘बातमी’ माझ्याभोवती पिंगा घालत नाचू लागली. लहानपणापासून माझं आणि बातम्यांचं जे नातं आहे, ते मलाच नव्याने उलगडत गेलं.
लहानपणी वर्तमानपत्रातून बातम्या वाचलेल्या, आकाशवाणीवर ऐकलेल्या आणि दूरदर्शनवर पाहिलेल्या आहेत. आजही बातम्यांची ती सिग्नेचर ट्यून काना- मनात गुंजत राहते. त्या बातम्यांची ती ठराविक वेळ, बातमीदाराच्या आवाजातील गांभीर्य आणि गोडवा, पोशाखातील सौम्यता, दृश्यातील संयम, बातम्यांची लेखन- निवेदनातील अचूकता, वस्तुनिष्ठ तटस्थता या सर्वांनीच बातम्यांच्या बाबतीत जनमनात एक प्रचंड विश्वासार्हता निर्माण केलेली होती.
बातम्यांची वेळ झाली की घराला चिडीचूप केलं जात होतं. लहान मुलांची रवानगी अंगणात व्हायची. स्वयंपाकघरातून कुकरची शिट्टी त्यावेळी वाजू नये, भांड्या-कुंड्यांचा आवाज होऊ नये याचे नियोजन केले जायचे. “श्…..! बाप्पा (माझे मोठे काका) बातम्या ऐकत आहेत. आवाज करायचा नाही.” हे वाक्य तर मला आजही कानात ऐकू येते. आणि या वाक्यानीच त्या नकळत्या वयातही ‘बातम्या’ म्हणजे खूप काही तरी महत्त्वाचे आहे, हे मनावर कायमचे कोरले गेले.
महाविद्यालयीन शिक्षण घेताना घडणाऱ्या घटना, येणाऱ्या बातम्या आणि अभ्यासक्रम यांची जी सांगड अध्ययन – अध्यापनात घातली जात होती त्यातून कार्यकारणभाव, ‘रिडिंग बिट्वीन द लाईन’, तार्किकता, एककल्लीपणाचा अर्थ, निष्पक्षता असे बरेच काही कळत गेलं. कै. अनंत भालेरावांच्या समग्र लेखनाचा अभ्यास करताना पत्रकारितेतील ‘ध्येयवाद’ आणि ‘धंदा’ यावरची त्यांची परखड मतं वाचायला मिळाली. बदलत्या काळानुरूप पत्रकारिता एक धंदा झालेला असला तरी देखील तो प्रामाणिकपणे का करता येऊ नये ?, या प्रश्नाने अंतर्मुख केले.
काळ सातत्याने पुढे जात राहिला. विज्ञान – तंत्रज्ञानाने त्याची गती वाढवली. साध्या वर्तमानपत्राबरोबर इ – वर्तमानपत्र आले, रेडिओ आणि दूरदर्शनवर विविध वाहिन्या (चॅनल्स) सुरु झाल्या. बातम्यांचे स्वतंत्र चॅनल्स आले. २४ तास बातम्या सुरु राहू लागल्या. अगदी ‘अभी तक’ अशी जीवघेणी स्पर्धा सुरू झाली. या स्पर्धेत विश्वासार्हता कधीच मागे पडली. आवाजी आणि भडक बातमी हे बातमीचं नवीन वैशिष्ट्य जन्माला आले. बातमीच्या स्त्रोतासह सर्वच क्षेत्रात आपलेच अधिराज्य राहील असा प्रयत्न धनसंपन्न प्रसारमाध्यमांकडून होऊ लागला. पैशांच्या जोरावर संपादकाचे स्वातंत्र्य, धोरणाची दिशा, लोकशाहीचा आवाज, स्वस्तुतीचे भोंगे विकत घेतले जाऊ लागले. पैशांचा माज इतरांच्या स्वातंत्र्याची बूज ठेवेनासा झाला. बाणेदार संपादक पायउतार होऊ लागले. वर्तमानपत्राच्या जन्माबरोबर तेजस्वीतेचे बाळसं धरलेल्या पत्रकारितेला ग्रहण लागू लागले. सुविधा वाढत गेल्या आणि सत्त्व हरपत गेले. प्रामाणिकतेचा -हास झाला. लोकशाहीचा चौथा खांब डळमळीत होऊ लागला.
हे सारं कमीच होते बहुदा. त्यामुळे विकसित तंत्रज्ञानाने आता माणसाच्या हाती कोलीतच दिलं. समाजमाध्यमांवरून स्वत:च्या बातम्या स्वत:च प्रसिद्ध करण्याची, ऑडिओ – व्हिडीओ पोस्ट करण्याची सोय झाली. बातमीतील बात, वार्ता लोप पावून ‘मी’ तेवढा सगळीकडे दिमाखात वावरू लागला आहे. काही केलं नाही तरी चालतं पण सांगितलं गेलं पाहिजे, हा आग्रह वाढीस लागला आहे. आभासी जीवन जगण्याच्या नादात बुद्धी आणि विचार हे आपले वैशिष्ट्य आहे हे विसरलेला माणूस पोस्ट दिसताक्षणी अंगठे दाखवून, लाईक करून मोकळा होतो. सुशिक्षितपणाकडून अंगठेबहाद्दरतेकडे आपली पुन्हा वाटचाल सुरु झाली आहे.
चांगल्या गोष्टींचै कौतुक करण्यासाठी आणि चुकीच्या गोष्टींचा निषेध करत त्यांना धाक दाखवण्यासाठी संघटित होणारा समाज संघटनाचे सूत्रच विसरला. एकटा पडलेला माणूस भयभीत होऊन, होयबा व्हायला लागला. माझं मत व्यक्त केलं तर त्याची किंमत मोजावी लागेल या भीतीने त्याचा स्व, त्याचा स्वाभिमान, त्याची अस्मिता हिरावून घेतली. कटपुतली होण्याला मान्यता देऊन सुरक्षित पिंजरा विकत घेण्याला त्यानं प्राधान्य दिले. काहींनी पिंजरे नाकारले तरी उदासीनता किंवा मौन स्वीकारलं. क्वचित बोलणारे उरले त्यांची सगळे उपेक्षा करू लागले. हे चित्र नसणारे क्षेत्र आज सापडणे केवळ अशक्य आहे. आणि आमची अपेक्षा मात्र सांगते, समाज असावा गुणी; प्रश्न आहे तो करावा कोणी? कारण आम्हाला सवयच लागली आहे, आमच्यासाठी इतरांनी काहीतरी करावे. आपल्या मात्र केसालाही धक्का लागू नये. सुरक्षिततेच्या नावाखाली आम्ही षंढपणाने जगणे मान्य करतो, त्याला व्यावहारिक शहाणपणाचे गोंडस नाव देत !
ताई, तुम्ही अण्णांकडे गेला आहात. त्यांना सांगा, “आता तरी मनाला फारसं लावून घेऊ नका; तब्येतीला जपत जा म्हणावं. कारण हे असंच चालायचं. आमच्या सुखाच्या व्याख्या सुविधेपुरत्या मर्यादित झाल्या आहेत. मूल्यांशी नातं ठेवून जीवन होरपळून घ्यायला आम्ही वेडे नाहीत म्हणावं.”
वृंदा आशय
यावर आपले मत नोंदवा