विविध भाषा – साहित्य – संस्कृतीचे एक दर्जेदार लोकपीठ !

येथ चैतन्य सळसळावे !

तारुण्याचे तीन ‘त’ कार _ तत्परता, तेजस्विता, तपस्विता

युवकांचे चिरंतन प्रेरणास्थान असलेले स्वामी विवेकानंद
आणि
‘वंदे मातरम्’ चे सूत्र युवा मनात पेरत राहणारे गोविंदभाई श्रॉफ यांना ज्ञानोत्सव तर्फे विनम्र अभिवादन – वृंदा आशय
उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत । क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गं पथस्तत्कवयो वदन्ति ॥ १४॥
( कठोपनिषद )


गोविंदभाई : जगणे एका तत्त्वनिष्ठेचे – अनंत भालेराव

असे म्हणतात की सर्व प्रकारची परिवर्तने शासनसंस्था (गव्हर्नमेंट) कोणत्या ना कोणत्या मिषाने जिरवून व खाऊन टाकत असते. सत्तेचे असे विलक्षण सामर्थ्य असते. म्हणून भलेभले दिग्गज पाठीवर अंबाऱ्या घेऊन सत्तेच्या प्रासादासमोर झुलत असतात. सत्तेला खडसावणारे, तिला आपली जागा दाखवणारे व तिचे पाश अव्हेरणारे फार कमी असतात. नदीच्या प्रवाहातील लहानमोठे खडक आणि दगड पाण्याचा प्रवाह अवरुद्ध न करता पाणी नितळ राखीत असतात. तसेच सत्तेला अव्हेरणारे ज्या समाजात आहेत तिथे सामाजिक जीवनाची सरिता अखंड व निर्मळ प्रवाहाची धनी असते.

सरदार वल्लभभाई पटेल मृत्यूच्या आधी औरंगाबादी आले होते. तेव्हा ते उपपंतप्रधान व गृहमंत्री होते. औरंगाबादला येण्याचे खास कारण काही नव्हते. सार्वजनिक कार्यक्रमही नव्हते. सरदारजींचा मुक्काम तेव्हाच्या रेल्वे हॉटेलात होता. माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी या सरदारांचे नाव काढताच मोठमोठ्यांची कशी तारांबळ व गाळण उडते हे मी स्वतः बघितले मुक्कामात फक्त एकाच व्यक्तीची भेट घेतली आणि ती व्यक्ती होती गोविंदभाई ही. आहे. सरदारांविषयी भाईंना नितांत आदर होता. त्यांच्याशी मतभेदही तेवढेच तीव्र होते. बोलावणे आले म्हणून भाई नेहमीच्या पद्धतीने स्वखर्चाने टांगा करून व सरकारी वाहन नाकारून वल्लभभाईंच्या भेटीला गेले. सरदार त्यांच्या एका खोलीत एका मोठ्या कोचावर मांडी घालून बसले होते. भाईंना त्यांनी जवळ बसवून घेतले. हैद्राबाद स्टेट काँग्रेसमधील मतभेद विकोपाला गेले होते व भाई स्वतः एका गटाचे तेव्हा म्होरके होते. सरदारजींना सत्तेच्या संदर्भात जवळ होते ते बी० रामकृष्णराव वगैरे नेमस्त. हे लोक स्वामीजी व गोविंदभाईंचे कडवे विरोधक होते. सरदारजींनी तडजोड लादल्यानंतरच्या वेळी ही भेट घडून येत होती. सुमारे तास-दीडतास ही भेट झाली. भेटीत काय झाले हे भाई कधी सांगत नाहीत. सरदारांचा तर प्रश्नच नाही. काळाच्या ओघात अनेक रहस्ये व गुपिते चव्हाट्यावर येऊन जगजाहीर झाली आहेत. सरदारजींनी भाईंना वडिलकीच्या नात्याने समजावून सांगितले. त्यांच्यापाशी देण्यासारखे पुष्कळ होते. परंतु त्यांनी ज्याला तडजोड कर, थोडे तरी मिळते घे, तुझे सोने होईल असे समजावून सांगितले, तो एकाच वेळी गांधी आणि गार्क्सचा अनुयायी होता. निष्ठांशी प्रतारणा त्याच्याकडून होण्याची सुतराम शक्यता नव्हती. कल्पतरूच्या तळाशी बसून शिशिराची व पानगळीची मागणी करणारा हा पांथस्थ होता. सरदारजीही मोठे होते. सत्तेचे लाचार त्यांनी कमी का बघितले होते ? सत्ता लाथाड-णारा हा माणूस बघून सरदारांनाही मनोमनी बरेच वाटले असेल. कल्पना नसताना त्यांना एक मार्क्सवादी तुकाराम भेटला होता व तो म्हणत होता :

तुझी भेट घेणें काय हें मागणे

आशेचें हें शून्य केलें आम्ही

(स्त्रोत – मांदियाळी – अनंत भालेराव )


•|ॐ|•

शब्दवेध

‘विकार’ आणि ‘स्वीकार’

‘विकार’ आणि ‘स्वीकार’ या दोन शब्दांची मला मोठीच गंमत वाटते. कारण हे दोन शब्द उच्चारल्याबरोबर मनामध्ये सुरू होतो तो तीव्र नकार! विकार म्हणलं की आम्हाला आठवतात फक्त आजार आणि स्वीकार म्हणलं की त्याच्यापाठोपाठ पालुपद येतं, ‘मी जे म्हणेल ते स्वीकार’ ; मग यांच्या पाठीमागे ‘नकारा’नं येणं अगदीच स्वाभाविक नाही का?

… म्हणून माणसाने थोडं थांबावं. प्रतिक्रियेच्या ऐवजी प्रतिसाद द्यावा. मग आपसूकच कळायला लागतं, ‘विकार’ शब्दाचा एक अर्थ ‘बदल’ असाही आहे. हा अर्थ मनामध्ये फुलल्याबरोबर

‘परिवर्तन हि संसार का नियम है!

असं सांगणारा ‘कृष्ण’ त्या पाठोपाठ आपल्या मनात उभा राहतो. नकळतच आपण होतो त्याच्यासमोर नतमस्तक. कारण त्याचा शब्द आपल्यासाठी अंतिम शब्द असतो. तिथे नसतं ‘जर – तर’, ‘पण – बिण’, ‘कारण – तारण’, तिथे असतं फक्त समर्पण! हा समर्पणाचा भाव मनामध्ये फुलला की स्वीकारातला परम आनंद कळायला लागतो. मग या स्वीकारण्यामध्येच, ‘हे आपल्याला मिळालं’ म्हणून आपण स्वतःला भाग्यवंत मानायला लागतो. अहो, तो शेवटी भगवंतच आहे. तो प्रत्येकालाच भाग्यवंत करणार. कारण ते विधिलिखित आहे. यम नियमातून अष्टांग योगाचा संसार मांडणारा तो नियम कसा तोडेल बरे?

‘विकार’ आणि ‘स्वीकार’ या शब्दांच्या प्रथमदर्शनी त्यात फरक दिसतो तो फक्त अर्ध्या ‘स्’ चा! माझ्या खट्याळ मनामध्ये शब्द जागा होतो स्वीकार म्हणजे ‘स-विकार’. स्वीकार करायचा तो विकार या शब्दाच्या दोन्ही अर्थांचा. बदल आनंदाने स्वीकारायचा कारण तो कृष्णाचा आदेश आहे. आजार स्वीकारायचे म्हणजे मान्य करायचे. कारण ती आत्मपरीक्षणाची एक मोठी संधी आहे. आजार स्वीकारले की उपचार करता येतात. स्वतःला स्वतःचा आधार होता येते. स्वतःमध्ये सुधारणा करता येते. गतीने प्रगती करण्याचा एवढा सुंदर मार्ग मला तरी दुसऱा कोणता वाटत नाही.

संपूर्ण समर्पण!

शुभं भवतु !

  वृंदा आशय 

     🙏🏻श्रीकृष्णार्पणमस्तु !🙏🏻

श्री संत तुकाराम बीजेनिमित्त दिनांक ०५ मार्च २०२६ रोजी

श्री .वरद गणेश मंदिर , छत्रपती संभाजीनगर याठिकाणी झालेला वाणीचा उत्सव

विषय – संत तुकारामांच्या अभंगातून (खरं तर जीवनातून ) प्रकटणारे श्री विठठलाचे स्वरूप

वक्ता – वृंदा आशय

चित्रिकरण व संपादन सहाय्य – श्री शर्विल आशय जोशी

शुभं भवतु !

श्रीकृष्णार्पणमस्तु !


यावर आपले मत नोंदवा