
जे पिंडी ते ब्रह्मांडी
तो अंत:रंगी राहतो
हे सारे जग पाहतो
काय कोठे घडते ते
तोच मला सांगतो !
तो त्रिकालदर्शी
पाहूनी मनी हर्षी
अंत:रंगी प्रकाशी
सहस्त्ररश्मी साक्षी
तो उच्चरवे सांगतो
जे पिंडी ते ब्रह्मांडी
अंतरीचे तेज:कण
सुज्ञ कधीही न सांडी
वृंदा आशय
श्रीकृष्णार्पणमस्तु!

डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांना १३५ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !

(सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालयातील एन.एस.एस. च्या विद्यार्थिनींनी काढलेल्या रांगोळ्या)
बाबासाहेबांचे संविधान सभेतील शेवटचे भाषण
दिनांक २६ नोव्हेंबर १९४९ ला संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्रप्रसाद यांचे समारोपाचे भाषण होऊन त्यादिवशी भारताचे संविधान संमत झाले. त्याच्या एक दिवस आधी म्हणजे २५ नोव्हेंबर १९४९ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारतीय संविधानाचे शिल्पकार या शब्दांनी ज्यांचा सार्थ गौरव होतो, यांचे संविधान सभेत शेवटचे भाषण झाले.
………………………………………………
घटना समितीचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र प्रसाद यांचे बाबासाहेबांबद्दलचे गौरवोद्गार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची निवड किती सार्थ होती हे संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान संमत करताना केलेल्या शेवटच्या भाषणात डॉ. आंबेडकरांच्या प्रती ज्या भावना व्यक्त केल्या त्यावरुन दिसून येईल. डॉ. राजेंद्रप्रसाद म्हणतात, “या खुर्चीत बसून संविधान सभेच्या कार्याचे मी प्रत्येक दिवशी निरीक्षण करत आलो आहे. संविधान सभेच्या मसुदा समितीवरील सभासदांनी किती उत्साहाने, चिकाटीने नि निष्ठेने कार्य पार पाडले याची खरी जाणीव अन्य कोणापेक्षाही मला अधिक आहे. विशेषत: त्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. आंबेडकर यांनी आपल्या प्रकृतीची क्षिती न बाळगता ते काम तडीस नेले आहे. मसुदा समितीवर आणि तिच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्याचा जो निर्णय आपण घेतला त्याच्याइतका अचूक निर्णय दुसरा कोणी घेतला नाही. त्यांनी आपल्या निवडीची यथार्थता पटवून दिली. इतकेच नव्हे, तर त्यांनी जे हे कार्य केले त्याला एक प्रकारचा तेजस्वीपणा आणला.”
……………………………………………..
बाबासाहेबांचे संविधान सभेतील शेवटचे भाषण
…माझ्या मते, संविधान कितीही चांगले असो, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते जर अप्रामाणिक असतील तर ते वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही. तसेच संविधान कितीही वाईट असो, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते जर प्रामाणिक असतील तर ते चांगले ठरल्याशिवाय राहणार नाही. संविधानाचा अंमल हा संपूर्णत: संविधानाच्या स्वरुपावर अवलंबून नसतो. संविधान हे केवळ राज्याचे काही विभाग – जसे की कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, आणि न्यायपालिका निर्माण करुन देते. राज्याच्या या विभागांचे कार्य लोक आणि लोकांनी स्वत:च्या आकांक्षा आणि राजकारणासाठी साधन म्हणून निर्माण केलेले राजकीय पक्ष यावर अवलंबून राहणार आहे.
…केवळ बाह्य स्वरुपात नव्हे, तर प्रत्यक्षात लोकशाही अस्तित्वात यावी अशी जर आपली इच्छा असेल, तर त्यासाठी आपण काय करायला हवे? माझ्यामते पहिली गोष्ट जी केलीच पाहिजे ती ती अशी की, आपल्या सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आपण संवैधानिक मार्गांचीच कास धरली पाहिजे. याच अर्थ हा की, क्रांतीचा रक्तरंजित मार्ग आपण पूर्णत: दूर सारला पाहिजे. याचा अर्थ कायदेभंग, असहकार आणि सत्याग्रह या मार्गांना आपण दूर ठेवले पाहिजे. आर्थिक आणि सामाजिक उद्दिष्टपूर्तीसाठी संवैधानिक मार्गासारखा कोणताही मार्ग शिल्लक नव्हता, त्यावेळी असंवैधानिक मार्गाचा अवलंब करण्याचे समर्थन मोठ्या प्रमाणात केले जात होते.परंतु जेव्हा संवैधानिक मार्ग उपलब्ध आहेत तेव्हा या असंवैधानिक मार्गांचे समर्थन होऊ शकत नाही. हे मार्ग इतर काही नसून अराजकतेचे व्याकरण आहे आणि जितक्या लवकर आपण त्यांना दूर सारु तेवढे ते आपल्या हिताचे होईल.
दुसरी महत्वाची गोष्ट, जिचे पालन केले पाहिजे ती अशी की, लोकशाहीच्या संवर्धनात आस्था असणाऱ्या सर्वांना जॉन स्टुअर्ट मिल यांनी दिलेला सावधगिरीचा इशारा लक्षात ठेवावा लागेल. त्यांच्या मते, “लोकांनी आपले स्वातंत्र्य कितीही मोठा माणूस असला तरी त्याच्या चरणी अर्पण करता कामा नये. तसेच त्याच्यावर इतका विश्वास ठेवू नये, की जेणे करुन त्याला प्राप्त अधिकारांचा तो लोकांच्या संस्था उदध्वस्त करण्यासाठी उपयोग करील.” संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी व्यतित केलेल्या महापुरुषांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात काहीच गैर नाही. परंतु कृतज्ञता व्यक्त करण्यालाही मर्यादा असल्या पाहिजेत. आयरीश देशभक्त डॅनियल ओकॉनेल यांनी समर्पकपणे म्हटल्याप्रमाणे, “कोणताही माणूस स्वाभिमानाचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करु शकत नाही, कोणतीही स्त्री स्वत:च्या शीलाचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करु शकत नाही आणि कोणताही देश स्वत:च्या स्वातंत्र्याचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करु शकत नाही.” इतर देशांच्या तुलनेत भारताला सावधगिरीचा इशारा लक्षात घेणे अधिक गरजेचे आहे, कारण भारतात भक्ती किंवा जिला भक्तीचा मार्ग म्हणता येईल तो किंवा विभूतीपूजा ही जगातील इतर कोणत्याही राजकारणात दिसणार नाही, इतक्या मोठ्या प्रमाणात भारतीय राजकारणात दिसते. धर्मातील भक्ती ही आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग असू शकेल. परंतु राजकारणात भक्ती किंवा व्यक्तिपूजा ही अध:पतन आणि अंतिमत: हुकूमशाहीकडे नेणारा हमखास मार्ग ठरतो.
तिसरी गोष्ट आपण केली पाहिजे की अशी, की केवळ राजकीय लोकशाहीवर आपण समाधान मानता कामा नये. आपल्या राजकीय लोकशाहीचे आपण एका सामाजिक लोकशाहीत सुद्धा परिवर्तन करायलाच हवे. राजकीय लोकशाहीच्या मुळाशी सामाजिक लोकशाहीचा आधार नसेल, तर ती अधिक काळ टिकू शकणार नाही.
सामाजिक लोकशाही म्हणजे काय? तो एक जीवन मार्ग आहे, जो स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांना जीवनतत्वे म्हणून मान्यता देतो. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ह्या तत्वांचा एका त्रयीची स्वतंत्र अंगे म्हणून विचार करता येणार नाही. ते त्रयीचा एक संघ निर्माण करतात, ते या अर्थाने की, त्यापैकी एकाची दुसऱ्यापासून फारकत करणे म्हणजे लोकशाहीचा मूळ उद्देशच पराभूत करणे होय. समतेपासून स्वातंत्र्य वेगळे करता येत नाही. समतेशिवाय स्वातंत्र्य म्हणजे काही लोकांचे बहुतांश लोकांवर प्रभुत्व निर्माण करणे होय; स्वातंत्र्याशिवाय समता ही वैयक्तिक कर्तृत्वाला मारक ठरेल. बंधुत्वाशिवाय स्वातंत्र्य आणि समता स्वभाविकरित्या आस्तित्वात राहणार नाहीत, त्यांच्या अंमलबजावणीसाठी पोलिस यंत्रणेची गरज भासेल. भारतीय समाजात दोन बाबींचा पूर्णत: अभाव आहे ही वस्तुस्थिती मान्य करुनच आपण सुरुवात केली पाहिजे. त्यापैकी एक समता आहे. सामाजिक क्षेत्रात आपला समाज हा श्रेणीबद्ध विषमतेच्या तत्वावर आधारित आहे. याचा अर्थ काही लोक वरच्या स्तरावर असतात तर बाकीचे निष्कृष्ट अवस्थेत असतात. आर्थिक क्षेत्रात आपल्या समाजात काहींजवळ गडगंज संपत्ती आहे, तर अनेक लोक घृणास्पद दारिद्र्यात जगतात. २६ जानेवारी १९५० ला आपण एका विसंगतीयुक्त जीवनात प्रवेश करणार आहोत, राजकारणात आपल्याकडे समता राहील परंतु सामाजिक आणि आर्थिक जीवनात विषमता राहील. राजकारणात प्रत्येकाला एक मत आणि प्रत्येक मताचे समान मूल्य या तत्त्वाला आपण मान्यता देणार आहोत. आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात मात्र, सामाजिक आणि आर्थिक संरचनेमुळे, प्रत्येक माणसाला समान मूल्य हे तत्त्व आपण नाकारत राहणार आहोत. अशा परस्पर विरोधी जीवनात आपण आणखी किती काळ राहणार आहोत? आपण जर ती अधिक काळपर्यंत नाकारत राहिलो, तर आपली राजकीय लोकशाही आपण धोक्यात आणल्याशिवाय राहणार नाही. ही विसंगती शक्य होईल तेवढ्या लवकर आपण दूर केली पाहिजे. अन्यथा ज्यांना विषमतेचे परिणाम भोगावे लागत आहेत ते या सभेने अतिशय परिश्रमाने निर्माण केलेली राजकीय लोकशाही संरचना उदध्वस्त करतील.
आपल्यात उणीव असलेली दुसरी बाब म्हणजे बंधुत्वाचे तत्त्व मान्य करणे होय. बंधुत्व म्हणजे काय? जर भारतीय लोक एक असतील तर सर्व भारतीयांमध्ये बंधुत्वाची समान भावना असणे हे होय. हे तत्व सामाजिक जीवनाला एकता आणि एकजिनसीपणा प्राप्त करुन देते. ही बाब प्राप्त करणे कठीण आहे. ती किती कठीण आहे, हे संयुक्त राष्ट्र अमेरिकेविषयी जेम्स ब्राईसने त्याच्या अमेरिकन कॉमनवेल्थ या खंडात सांगितलेल्या गोष्टीवरुन कळून येईल.
ब्राईसच्याच शब्दात मी उद्धृत करु इच्छितो, ती घटना अशी-
“काही वर्षापूर्वी अमेरिकन प्रोटेस्टंट एपिस्कोपल चर्चच्या त्रैवार्षिक अधिवेशनात सामुदायिक प्रार्थनेत फरबदल करण्याचा प्रसंग आला. प्रार्थना लहान वाक्यांची करुन त्यात सर्व लोकांसाठी असेल्या प्रार्थनेचा समावेश करणे योग्य होईल असा विचार करण्यात आला आणि न्यू इंग्लंडच्या प्रमुख धर्मोपदेशकाने पुढील शब्द सुचविले, “हे प्रभो, आमच्या राष्ट्राला आशीर्वाद दे.” उत्स्फूर्तपणे ते त्या दिवशी मान्य करण्यात आले. या वाक्यावर दुसऱ्या दिवशी पुन्हा विचार करण्यात आला. धर्मोपदेशकांव्यतिरिक्त इतर अनेकांनी ‘राष्ट्र’ या शब्दावर आक्षेप घेतले. त्यांच्या मते या शब्दामुळे संपूर्ण राष्ट्राचे ऐक्य प्रत्यक्षात नसले तरी स्पष्टपणे सूचित होते. त्यामुळे तो शब्द गाळण्यात आला आणि “हे प्रभो, संयुक्त राज्यांना आशीर्वाद दे.” या शब्दांचा स्वीकार करण्यात आला.”
ही घटना घडली त्यावेळी अमेरिकेतील लोकांमध्ये एकत्वाची भावना इतकी कमी होती की, आपण एक राष्ट्र आहोत असे अमेरिकेच्या लोकांना वाटत नव्हते. जर अमेरिकेच्या लोकांमध्ये आपण राष्ट्र आहोत ही भावना निर्माण होऊ शकली नाही तर भारतीयांनी आपण एक राष्ट्र आहोत हे समजणे किती कठीण आहे हे कळून येईल. मला ते दिवस आठवतात जेव्हा राजकारणाने प्रेरित लोकांना ‘भारतीय लोक’ या शब्दाची चीड येत असे. भारतीय राष्ट्र म्हणणे ते पसंत करत असत. मी या मताचा आहे की आपण एक राष्ट्र आहोत यावर विश्वास ठेवणे म्हणजे जे अस्तित्वात नाही ते अस्तित्वात आहे असा समज बाळगण्यासारखे होईल. हजारो जातींमध्ये विभागलेल्या लोकांचे राष्ट्र कसे बनू शकेल? सामाजिक आणि मानसिकदृष्ट्या अजूनही आम्ही एक राष्ट्र नाही याची आम्हाला जेवढ्या लवकर जाणीव होईल तेवढे ते आमच्या हिताचे ठरेल. त्यांनतरच एक राष्ट्र होण्याच्या गरजेचा आम्ही गांभीर्याने विचार करु शकू. या ध्येयाप्रत पोहोचणे अतिशय कठीण आहे. अमेरिकेत जातीची समस्या नाही. भारतात जाती आहेत. जाती या राष्ट्रविरोधी आहेत. पहिली गोष्ट त्या समाजजीवनात विभागणी करतात. त्या राष्ट्रविरोधी आहेत कारण त्या जाती-जातीमध्ये मत्सर व तिरस्काराची भावना निर्माण करतात. आम्हाला वास्तवात जर राष्ट्र व्हायचे असेल तर या सर्व अडथळ्यांवर आम्ही मात केलीच पाहिजे. राष्ट्र निर्मिती नंतरच बंधुत्व वास्तवात पाहावयास मिळेल. बंधुत्वाशिवाय असलेली समता आणि स्वातंत्र्य म्हणजे रंगाच्या वरवरच्या थरांसारखा केवळ बाह्य देखावा असेल.
…स्वातंत्र्य ही आनंदाची बाब आहे याबद्दल शंका नाही. परंतु या स्वातंत्र्याने आपल्यावर फार मोठ्या जबाबदाऱ्या टाकलेल्या आहेत याचा आपण विसर पडू देता कामा नये. या स्वातंत्र्यामुळे, कोणत्याही वाईट गोष्टीसाठी आपल्याला आता इंग्रजांवर दोषारोपण करता येणार नाही. यापुढे जर काही वाईट घडले, तर त्यासाठी आपल्याशिवाय इतर कुणालाही दोषी धरता येणार नाही. अनुचित घटना घडण्याचा मोठा धोका आहे. काळ वेगाने बदलतो आहे. आपले लोकसुद्धा, नवनवीन विचारप्रणालींचा मागोवा घेत आहेत. लोकांच्या राज्याचा आता त्यांना कंटाळा येऊ लागला आहे. आता त्यांना लोकांसाठी राज्य हवे आहे. आणि राज्य लोकांचे व लोकांनी निवडलेले आहे किंवा नाही याची चिंता ते करणार नाहीत. ज्या संविधानात आपण लोकांचे, लोकांकरिता निवडलेले शासन या तत्त्वाचे जतन केले आहे ते तर आपल्याला सुरक्षित ठेवायचे असेल, तर आपल्या मार्गात कोणते अडथळे येणार आहेत ते आपण ओळखले पाहिजेत, की जेणेकरुन लोकांनी निवडून दिलेल्या सरकारच्या तुलनेत लोकांसाठी असलेल्या सरकारला लोक प्राधान्य देण्याकडे वळतील. यासाठी पुढाकार घेण्यात आपण दुर्बल ठरता कामा नये. देशाची सेवा करण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. दुसरा अधिक चांगला मार्ग मला माहीत नाही.
………………………………………………………..
(स्रोत: डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड १८, भाग ३- १९४६ ते १९५६)
चित्रफित निर्मिती – वर्षा देशपांडे
https://www.instagram.com/reel/DVgiDvREr0X/?utm_source=ig_web_copy_link&igsh=NTc4MTIwNjQ2YQ==

धनुर्धरः स धीरः स्याद्धनुर्धर इव स्थितः॥
धन से धन संचित (धारण) किया जाता है और धैर्य से पृथ्वी को धारण करने वाले (राजा या शेषनाग) की शक्ति प्राप्त होती है। वही व्यक्ति वास्तव में ‘धीर’ (बुद्धिमान और साहसी) कहलाता है, जो धनुर्धारी के समान एकाग्र और अडिग होकर अपने लक्ष्य पर टिका रहता है।

बुद्ध व्हावं लागतं
काळ सांगे आता
माणसा तुला प्रबुद्ध व्हावं लागतं!
|| ॐ नमो भगवते वासुदेवाय ||
मुक्त चिंतन
‘वाचाल’ आणि ‘वाचाल’
वास्तविक पाहता वरचे दोन शब्द ‘वाचाल तर वाचाल’ या म्हणीमधून मराठी माणसाला अगदी अचूकपणे माहीत आहेत. त्यामुळे आज यातल्या कोणत्याच शब्दाच्या अर्थाचं स्पष्टीकरण मला करावं वाटत नाही. मात्र काय वाचावं याबद्दल निश्चितच बोलावं वाटतं.
साधारणपणे ‘वाचन’ म्हणलं की आपल्या डोळ्यांसमोर येतात ती पुस्तकं. आणि स्वाभाविकपणाने आपण एखाद्याला मागतो ती पुस्तकांची यादी. आज वेगवेगळ्या निमित्ताने वेगवेगळ्या प्रकारच्या पुस्तकांच्या याद्या भरपूरच उपलब्ध आहेत. त्यामुळे एकही पुस्तक सुद्धा मी इथे सुचवू इच्छित नाही.
मला वाटतं पुस्तकं तर वाचलीच पाहिजेत कारण ती आपल्यासमोर एक फार मोठे जग खुलं करतात आणि तेही अगदी निरपेक्षपणे ! त्याचबरोबर आपण ‘माणसं’ही वाचावीत आणि ‘सृष्टी’ही वाचावी असं मात्र मला आवर्जून वाटतं ! खरंतर माणूस हा सृष्टीचाच एक भाग आहे, पण असो.
माणसं वाचावीत असं म्हणलं की कदाचित माझ्या पिढीच्या लोकांना, ‘किताबें बहुत सी पढ़ी होगी तुमने मगर कोई चेहरा भी तुमने पढ़ा है’ हे हिंदी गाणं देखील आठवलं असेल. माणसांचे चेहरे तर वाचलेच पाहिजेत. कारण ते स्वतः देखील चेह-याइतकं खरं कधीच बोलत नाहीत. पण त्याचबरोबर माणसांची मनं देखील सतत वाचली पाहिजेत. कशी वाचावीत बरं ही मनं? कदाचित एखाद्याला वाटेल मन वाचता येतं का? काही विज्ञानप्रेमी लोकांना ही शक्यता सुद्धा हास्यास्पद वाटेल.
मात्र मला ठाम विश्वास आहे केवळ व्यक्तीचंच मन नव्हे तर समूहाची मनं सुद्धा सहज वाचता येतात. माणूस काय विचार करतो, तो कसा वागतो, तो काय पेहराव करतो, तो काय प्रतिक्रिया देतो, तो कधी प्रतिक्रिया देतो – कधी देत नाही, तो कोणत्या शब्दात, कोणत्या चिन्हात व्यक्त होतो या सर्वच गोष्टींचे जर बारकाईने आणि सातत्याने निरीक्षण केले तर मला वाटतं माणूस उघड्या पुस्तकासारखा वाचता येतो.
माणसाबरोबरच निसर्गही वाचावा. मला वाटतं सबंध सृष्टी माणसाला पुस्तकापेक्षाही केवळ काही अधिकच नव्हे तर अगदी भरभरून देत असते ! तिथे मात्र आम्हा सर्वसामान्य माणसांची अवस्था ‘देणाऱ्याचे हात हजारो, फाटकी माझी झोळी!’ अशी होऊन जाते. कर्णासारखा दानशूर असलेला
(खरं म्हणजे सृष्टीला अशी कोणतीच उपमा देता येत नाही. पण आपल्याला कर्णाची दानशूरता कळू शकते म्हणून ही उपमा वापरली इतकंच.) तर कर्णासारखा दानशूर असलेला हा निसर्ग जेव्हा आपल्या समोर असतोना, तेव्हा संपन्न होऊन जाणारे एखादेच ‘बालकवी’, एखादेच ‘मारुती चितमपल्ली’ घडू शकतात हे वास्तव आहे. त्यांची ही संपन्नता त्यांच्या देण्याने, त्यांच्या विचाराने, त्यांच्या कृतीने मानवी विश्वात त्यांना अजरामर करून जाते.
प्रत्येकाने अमरत्वाचा पट्टा धारण करावा हा अट्टाहास असण्याचं काहीच कारण नाही. पण आपलं आयुष्य आपल्याला भरभरून जगता आलं तर किमान आपण आपल्या स्वतःला आणि आपल्या सभोवतालाला काहीतरी देण्यासाठी पात्र होऊ म्हणून माणसाने निसर्ग वाचलाच पाहिजे.
निसर्ग वाचता आला की सूर्य आपल्याला असे काही तेज देतो की आपल्याकडे येणारा प्रत्येक ‘ताप’ आपल्या ‘तपा’मध्ये परिवर्तित होऊन जातो. चंद्र अशी काही शीतलता देतो की आपलं अस्तित्वच आल्हाददायी चांदणं होऊन जातं! वारा असं काही सामर्थ्य प्रदान करतो की आपण हवं तिथं ‘झुळूक’ आणि हवं तेव्हा ‘वादळा’चे रूप घेऊ शकतो. ओहळा सारखी उगम पावून समुद्राकडे झेपावणारी नदी जीवाला शिवाशी भेटण्याची ओढ म्हणजेच ‘जीवशिवैक्याची उत्कटता’ आपल्यामध्ये निर्माण करते. पृथ्वी तर आपल्याला सृजन – विसर्जनाचं चक्र शिकवून जाते. आकाशाचं तर आपण कृतज्ञच राहीलं पाहिजे, कारण ते सातत्याने खुणावत असतं आपला ‘स्व’ विस्तारण्यासाठी! मला वाटतं रोज उगवणारा आणि मावळणारा सूर्य जरी डोळसपणाने पाहिलाना तर माणसाच्या ‘मी’पणाचे विसर्जन होऊन जाईल.
शुभं भवतु !
वृंदा आशय
🙏श्रीकृष्णार्पणमस्तु! 🙏
यावर आपले मत नोंदवा